
जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या विनंतीनुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार संपूर्ण जळगाव जिल्हयातील सर्व किरकोळ मदयविक्री अनुज्ञप्त्या (सीएल-३ (देशी किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती, एफएल-२/ सीएल/एफएल/टिओडी-३ (विदेशी व देशी किरकोळ विक्री), एफएल-३ (परमिटरुम), एफएल/बिआर-२ (बियरशॉपी) तसेच टि.डी. १ (ताडी दुकाने) या सर्व अनुज्ञप्तीधारकांनी १४ एप्रिल २०२४ रोजी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवावेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून संबंधितांनी आदेशाची नोंद घेऊन त्याचे पालन करावे, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.





















