
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२६
बारामतीजवळ २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणातील तपास यंत्रणांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा अपघात की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे सुळे यांनी सांगितले. विशेषतः या प्रकरणातील ब्लॅक बॉक्सबाबत सतत बदलणारी माहिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरुवातीला ब्लॅक बॉक्स सापडला नसल्याचे सांगितले गेले, नंतर तो मिळाल्याची माहिती देण्यात आली, तर पुढे तो जळाल्याच्या चर्चा झाल्याने संपूर्ण प्रकरण गोंधळात टाकणारे ठरत असल्याचे त्या म्हणाल्या. दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र ब्लॅक बॉक्सच्या तपासाबाबत ठोस माहिती का दिली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्रात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याबाबतही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. रोहित पवार यांनीही या प्रकरणावर सातत्याने पाठपुरावा करत काही पुरावे समोर आणल्याचे सांगण्यात आले असून, कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
ब्लॅक बॉक्समधील डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवावा, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर न आल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.
पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुळे यांनी राज्य सरकारने हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित करावे, महिला अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि मुलींच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे म्हटले. तसेच राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी देशातील महागाई व बेरोजगारी वाढत असल्याचे सांगत सरकारवर टीका केली.





















