
जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुलीवर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडून एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओम सुनील गिरी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओम ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
दरम्यान, भररस्त्यात अपघात झाल्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. मृत ओम गिरी हे जळगाव जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष रवींद्र गिरी यांचे पुतणे असल्याचे समजते. या घटनेमुळे गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मानराज पार्क चौफुलीवर वारंवार अपघात होत असल्याने संतप्त नागरिकांकडून या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल तसेच जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.






















