
जळगाव मिरर | ५ जून २०२६

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जनमत प्रतिष्ठान आणि वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज विद्यालय तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
राज विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात माजी महापौर सौ. जयश्रीताई महाजन, नगरसेविका तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे पोलीस दक्षता समितीचे चंदन पाटील, साईमतचे वार्ताहर दीपक लोखंडे, पीएसआय संजय भांडारकर, संजय दोरकर, संजय सोनवणे, भरत चव्हाण, आरती कुमावत मॅडम, शशिकांत इंगळे, वेदांत एज्युकेशनच्या संचालिका हर्षली ढाके तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असमतोल याबाबत चिंता व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे सांगत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. वृक्षलागवडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.





















