
जळगाव मिरर | २१ जून २०२६

जिल्ह्यातील रसायनयुक्त विषारी फुग्याच्या दारूची सर्रास विक्री तसेच बनावट विदेशी दारूचा सुळसुळाट यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीने तक्रारी केल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये माजी विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही.टी. भूकन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना जिल्ह्यातील बेकायदा दारू विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येऊ नये, अशी पुन्हा तक्रार केली आहे.
याबाबत असे की, जिल्ह्यात विषारी दारूमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याची गंभीर बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे व पदाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रत्यक्ष भेटून थेट तक्रार करून निदर्शनास आणून दिली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग अगदी झोपेतून जागे झाल्यासारखा खोटा आव आणत ‘ॲक्शन मोड’ मध्ये आला आणि जिल्हाभर धाडसत्र सुरू केले.मात्र, ही कारवाई जनहितासाठी नसून केवळ दिखावा असल्याचे नंतरच्या घडामोडींमधून स्पष्ट झाले. आमच्या तक्रारीचा गैरफायदा घेत संबंधित अधिकाऱ्यांनी विषारी दारू विक्रेत्यांकडून वाढीव हप्ते वसूल करण्याचे फर्मान सोडल्याच्या तक्रारी पक्षाच्या पदाधिकारी यांना मिळाल्या असून उत्पादन शुल्क विभागाची साखळी यासाठी कार्यान्वित असल्याचे म्हटले आहे.बनावट विषारी म्हणजे रसायनयुक्त गावठी फुग्याच्या दारूमुळे एका-एका गावात ३५ ते ४० लोक मृत्यूमुखी पडल्याच्या घटना समोर आली असून ही अत्यंत संतापजनक बाब आहे.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा :
जिल्ह्यातील गावठी फुग्याची दारू व बनावट विदेशी दारू निर्मितीच्या व विक्रीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही.टी.भूकन यांच्यासह त्यांच्या हप्तेखोरीच्या साखळीत सहभागी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या विधिमंडळात दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुसार सदर जोशींना पाठीशी न घालता उचित कारवाई करण्याचे आदेश व्हावेत असे सुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
बचावासाठी उशिरा सुचलेले शहाणपण –
मंत्रालयात तक्रार केल्यानंतर आणि जिल्ह्याच्या या संवेदनशील प्रकरणाचा प्रश्न अधिवेशनात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतरच गावठी दारू निर्मितीचे अड्डे उध्वस्त करण्याचा बनाव केला जात आहे,हे शहाणपण आता का सुचले ? यापूर्वी अधीक्षक असलेल्या सीमा झावरे यांनी राबविलेल्या कारवाईचे सातत्य का ठेवले गेले नाही ? यापूर्वीच्या २-३ महिन्यांत विभागाने कोणती ठोस मोहीम राबविली ? किती गुन्हे दाखल झाले व किती दोषींना शिक्षा झाली ? असे सवाल दारूमुळे उद्वस्त झालेले अनेक कुटुंब विचारत आहेत. विभागाच्या निष्क्रिय आणि संशयास्पद भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्रालयाची बदनामी होत असल्याचे सुद्धा तक्रारीत म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांचा तक्रारीत आहे पुढाकार –
जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भोंगळ कारभाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे ई-मेल द्वारा करण्यात आलेल्या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे,भुसावळ शहराध्यक्ष नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,युवती जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे,नगरसेवक निलेश कोलते, भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील,युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण,सोपान दुट्टे, आसिफ बागवान,अँड.देवकांत पाटील,विनोद पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.





















