
जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील ८० लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई करून थांबू नये, तर संपूर्ण भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करून संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात एका नगरसेविकेच्या मुलाचाही उल्लेख असल्याची माहिती समोर आल्याने प्रकरण अधिकच गाजत आहे. त्यामुळे या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासह इतर कामांचे सुमारे ८० लाख रुपयांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला १८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती १५ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. शनिवारी (दि. ९ मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अहिरे यांना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान त्याच्याकडून सॅमसंग एस-२४ अल्ट्रा मोबाइल फोन तसेच बलेनो कार जप्त करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संभाव्य सहकारी आणि इतर पुरावे तपासण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश आर. एस. साळगावकर यांनी आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, जळगाव शहरात या कारवाईची मोठी चर्चा सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ एका अभियंत्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकारी, दलाल आणि राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



















