
जळगाव मिरर | २८ जून २०२६

अवघ्या ९०० रुपयांच्या गुटख्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून एका निष्पाप सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आव्हाणे शिवारात घडली. वडिलांवर फेकलेला लाकडी दांडूका चुकून जवळ उभ्या असलेल्या मुलाच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पानटपरीचालकाला अटक केली आहे.
मृत बालकाचे नाव वंश सुनील बारेला (वय ६) असे आहे. तो मुळचा उनपदेव (अडावद) येथील रहिवासी असून त्याचे कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून कामानिमित्त आव्हाणे येथे वास्तव्यास आहे. वंशचे वडील सुनील बारेला हे गावातील श्रीकांत चौधरी यांच्या म्हशीच्या गोठ्यात मजुरीचे काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील पानटपरीचालक मच्छिंद्र रमण पाटील याच्याकडे सुनील बारेला यांची विमल गुटख्याची सुमारे ९०० रुपयांची उधारी होती. शनिवारी सायंकाळी या उधारीवरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर संतापात झाल्यानंतर मच्छिंद्र पाटील याने गोठ्यात पडलेला लाकडी दांडूका उचलून सुनील बारेला यांच्या दिशेने जोरात फेकला.
सुनील यांनी प्रसंगावधान राखत दांडूका चुकवला. मात्र, त्याचवेळी जवळ उभा असलेला त्यांचा सहा वर्षीय मुलगा वंश याच्या डोक्याला दांडूका जोरात लागला. गंभीर दुखापत झाल्याने वंश खाली कोसळला. कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी मच्छिंद्र रमण पाटील याला घटनास्थळावरून ताब्यात घेत लाकडी दांडूका जप्त केला. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, केवळ क्षुल्लक कारणावरून निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याने आव्हाणे गावावर शोककळा पसरली आहे. वंशच्या पश्चात आई-वडील, दहा वर्षांची मोठी बहीण आणि तीन वर्षांचा लहान भाऊ असा परिवार आहे. एका क्षणाच्या संतापामुळे एका कुटुंबाचा आनंद हिरावला गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.




















