
जळगाव मिरर | २६ मे २०२६
राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या चार निष्पाप मुला – मुलींना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागातील राजुरा शिवारात सोमवारी २५ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.
या घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विजय मुसा किराडिया (२७, रा. राजुरा, ग्रामपंचायत उमापूर) असे मुलांना विहिरीत फेकून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या पित्याचे नाव आहे.
विजय आणि त्यांच्या पत्नीत तीव्र भांडण झाले होते. विजय यांनी रविवारी, २४ मे रोजी पत्नीला माहेरी सोडले. त्यानंतर तेथून परतल्यानंतर मध्यरात्री विजय यांनी आपली मुले प्रित (७), प्राची (५), पूर्वी (३) आणि अवघ्या दोन वर्षांचा पीयूष या चौघांनाही विहिरीत टाकले. त्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली. सोमवारी सकाळी काही ग्रामस्थांना विहिरीत तीन मृतदेह तरंगताना दिसले.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाचही मृतदेह विहिरीबाहेर काढले. पित्यासह चार निरागस मुलांचे मृतदेह पाहून सर्व सुन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पाचही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.




















