
जळगाव मिरर | १ जून २०२६
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत सोमवार, १ जूनपासून राज्यभर विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरातील एसटी आगार आणि बसस्थानक परिसरात ७८ हजार रोपांची लागवड करण्यात येणार असून प्रवाशांना सर्व एसटी स्वच्छतागृहांचा मोफत वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा अधिभार आकारण्यात आल्याने या निर्णयावरून चर्चेलाही उधाण आले आहे.
एसटी बसस्थानक, आगार परिसर तसेच स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. अनेक ठिकाणी पाणपोई बंद अवस्थेत तर स्वच्छतागृहांची दुरवस्था पाहायला मिळत होती. परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजी वाढत असून एसटी प्रशासनावर टीकाही होत होती. याच पार्श्वभूमीवर प्रवासी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महामंडळाने व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत बसस्थानक आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता, बंद पडलेल्या पाणपोई सुरू करणे, तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये आवश्यक सुविधा वाढवणे अशा उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. स्वच्छता आणि सुविधा सुधारण्याच्या माध्यमातून एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार, स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठीची खासगी कंत्राटदारी व्यवस्था बंद करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडे जबाबदारी असूनही अस्वच्छतेच्या तक्रारी कायम राहिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापुढे राज्यातील सर्व आगारांमधील स्वच्छतागृहांची देखभाल, स्वच्छता आणि आवश्यक सुविधा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळ स्वतः सांभाळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि एकसमान सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यात दरवर्षी १ जून हा दिवस एसटी महामंडळाचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. १ जून १९४८ रोजी पुण्यातून पहिल्या ‘लालपरी’ने धाव घेतली होती. त्या ऐतिहासिक दिवसाला यंदा ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी लवकरच एसटीच्या ताफ्यात ८ हजार नव्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. स्वच्छता, सुविधा आणि आधुनिक बससेवेच्या माध्यमातून एसटीची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.





















