
जळगाव मिरर | ५ जून २०२६

भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ शुक्रवारी दुपारी भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेसह दोन बालके आणि एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील फासे पारधी समाजातील काही कुटुंबीय वरणगाव परिसरातील कपीलनगर येथे पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते. ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत होते. शुक्रवारी दुपारी जय शंकर काळे (वय १९) हा आपल्या मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १) यांना दुचाकीवर घेऊन वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होता.

दरम्यान, वरणगावच्या पुढे त्यांच्या दुचाकीला एका भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून संबंधितांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. एका कुटुंबातील चार सदस्यांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने कपीलनगर परिसरासह संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध पोलीस घेत असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





















