
जळगाव मिरर | ६ जून २०२६

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रातील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सावखेडा मंडळाच्या मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडा येथील तापी नदीपात्रात नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात आल्याचे अलीकडेच उघड झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा वाळूसाठा जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाळू, यंत्रसामग्री आणि इतर बाबींचा समावेश असलेली एकूण दंडाची रक्कम दीड कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
अवैध उत्खननाच्या या प्रकारामुळे महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. चौकशीत संबंधित क्षेत्रातील महसूल अधिकाऱ्यांकडून योग्य देखरेख न झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आल्यानंतर अमळनेर आणि चोपडा येथील महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
दरम्यान, चौकशीअंती मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने महसूल विभागात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून, अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा आणि चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावरील संभाव्य कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणावर जबाबदारी निश्चित केली जाणार आणि शासन कोणती भूमिका घेणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील इतर वाळू घाटांवरील कामकाजाचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















