जळगाव मिरर | २८ जुलै २०२६
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील डिव्हायडर सुशोभीकरणाच्या नावाखाली लावण्यात आलेले भंगाळे गोल्डचे नियमबाह्य जाहिरात फलक अखेर महानगरपालिका प्रशासनाने हटविले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत उपायुक्तांनी संबंधितांना दोन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, त्यानंतरही नियमबाह्य फलक न काढल्याने मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत हे फलक हटविले.

महानगरपालिकेने शहरातील विविध दुभाजक (डिव्हायडर) सुशोभित करण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजकांसोबत करार करून त्यांना डिव्हायडर विकसित करण्याची परवानगी दिली होती. या करारामध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी स्पष्ट नियम व अटी घालण्यात आल्या होत्या.
नियमानुसार प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटरचे अंतर राखणे, फलकावरील ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या जनजागृती किंवा सार्वजनिक हिताच्या जाहिरातींसाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित ६० टक्के जागेवरच संबंधित संस्थेला किंवा व्यावसायिकाला जाहिरात करण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच डिव्हायडर सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात फलक उभारण्यापूर्वी महानगरपालिकेची ना हरकत प्रमाणपत्र घेणेही अनिवार्य करण्यात आले होते.
मात्र, संबंधितांनी या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. फलकांमध्ये आवश्यक अंतर न ठेवता संपूर्ण जागेवर स्वतःच्या व्यावसायिक जाहिराती लावण्यात आल्या. महानगरपालिकेच्या जनजागृतीसाठी राखीव असलेली जागाही वापरण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपायुक्तांनी २४ जुलै २०२६ रोजी संबंधितांना स्वतःहून जाहिरात फलक हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. मात्र, दिलेल्या मुदतीत कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने नियमबाह्य जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली.
या कारवाईनंतर शहरात अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने ठोस पाऊल उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरातील अनेक रस्ते आणि दुभाजकांवर नियमबाह्य जाहिरातींचा मोठ्या प्रमाणावर कब्जा झाला असून त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची नागरिकांची तक्रार होती.
दरम्यान, नव्याने रुजू झालेल्या महानगरपालिका आयुक्तांनी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई केल्याबद्दल विविध स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनीही या कारवाईचे स्वागत करत शहरातील सर्व अनधिकृत जाहिरात फलकांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.




















