
भडगाव : प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील कोठली येथे बकरींसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या ९ वर्षीय मुलाचा विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आजीच्या डोळ्यादेखत नातवाचा जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव कुणाल विलास भिल (वय ९, रा. कोठली, ता. भडगाव) असे आहे. शनिवारी (दि. ७) दुपारी सुमारे ४.४० वाजता कुणाल हा आपल्या आजी हिराबाई भिल यांच्यासोबत शिवारात बकरींसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. यावेळी तो सुबाभूळच्या झाडावर चढून चारा तोडत असताना झाडालगत गेलेल्या उच्चदाब वीजवाहिन्यांचा त्याला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने कुणालचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच आजी हिराबाई भिल यांनी आक्रोश करत मदतीसाठी हाका मारल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने कुणालला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने रुग्णालय परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोठली येथे शोकाकुल वातावरणात कुणालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाला पिळ घालणारा ठरला.
कुणाल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तो कोठली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. नुकतेच दुसरीचे शिक्षण पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात तिसरीत जाण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला. या प्रकरणी भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोठली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतशिवारातील वीजवाहिन्यांबाबत सुरक्षिततेचे उपाय अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




















