
जळगाव मिरर | ११ जून २०२६

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्पर बचावकार्यामुळे वाचले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. कामातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर ते काशीद समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते.
यावेळी अमीन शेख आणि मलिक शेख हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याचा आणि खोल भागाचा अंदाज न आल्याने दोघेही लाटांच्या तडाख्यात सापडून खोल पाण्याकडे ओढले गेले. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर घटनेची माहिती तातडीने बचाव पथक आणि पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच मुरुड पोलिसांचे कर्मचारी आणि लाइफगार्ड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून मलिक शेख याला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, अमीन शेख याचा शोध घेतल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले असता तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. अमीन शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पर्यटनस्थळी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घेणे, इशारा फलकांचे पालन करणे आणि लाइफगार्डच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




















