
जळगाव मिरर | २३ जून २०२६

मध्यरात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत असलेला ज्ञानेश्वर बारकू नारळे (वय २७, रा. खंडेरावनगर) या तरुणाचा मृतदेह शिवकॉलनीकडून आशाबाबा नगरकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला मिळून आला. या तरुणाच्या चेहऱ्याला दुखापत होवून रक्तबंबाळ झाल्यामुळे सुरुवातीला त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तो तरुण दारुच्या नशेत चेहऱ्यावर पडल्यामुळे त्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना सोमवार दि. २२ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात राहणारा ज्ञानेश्वर नारळे हा तरुण आई-वडीलांसह वास्तव्यास होता. गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावी नातेवाईकांकडे राहत होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच तो जळगाव येथे आई-वडीलांना भेटण्याकरीता आला होता. रविवार दि. २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वरने अतिमद्य सेवन केले. त्यानंतर तो शिवकॉलनीकडून आशाबाबानगरच्या दिशेने येत होता. यावेळी रस्त्याच्या कडेला तोल जावून पडल्याने त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रात्रभर रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच पडून होता. या परिसरात रात्री अंधार असल्यामुळे रात्रभर रस्त्याच्याकडेला पडलेल्या ज्ञानेश्वरकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
सोमवारी सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला इसम रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मयताच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसताच त्यांनी घातपाच्या संशयाच्या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली.
रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला असल्याची माहिती परिससरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानुसार परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी आले असता, त्यांनी मयत ज्ञानेश्वर असून तो खंडेराव नगरात राहत असल्याचे सांगितले. त्याचवेळी ज्ञानेश्वरचे आई-वडील हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत ज्ञानेश्वरची ओळख पटविल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
पोलिसांनी सुरुवातीला मयत ज्ञानेश्वरसोबत घातपात झाल्याच्या संशयावरुन त्याची त्या दिशेने तपास केला. मात्र ज्ञानेश्वर याला अतिदारुचे व्यसन असल्यामुळे त्याने रविवारी रात्रीच्या सुमारास अतीमद्य सेवन केले होते. दरम्यान, घराकडे परतत असतांना रस्त्याच्याकडेला तोल जावून तो तोंडावर आपटला. तसेच त्याचे दोघ हात अंगाखाली दबल्या गेल्यामुळे त्याला हालचाल करणे कठीण झाले. त्यामुळेच ज्ञानेश्वरचा दुर्देवी मृत्यू झाल्याच प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामानंव नगर पोलीस ठाण्यात अकस्मात्त मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर मयत ज्ञानेश्वर नारळे याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा पाहून त्याचे मामा रवी मोरे यांनी ज्ञानेश्वर सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाची सर्वबाजूने तपास केला जात आहे.





















