जळगाव मिरर | १७ जुलै २०२६
पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन “संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना” अंतर्गत गावठाण म्हणून तातडीने उपलब्ध करून द्यावी, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रश्नावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप गोर सेना व ग्रामस्थांनी केला असून, तातडीने निर्णय न झाल्यास ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गोर सेना आणि रामेश्वर तांडा ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ६९/अ ही शासकीय जमीन गावठाणासाठी उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वी शासन आदेश, तहसीलदारांचे पत्र, ग्रामसभा ठराव तसेच विविध शासकीय स्तरावरील पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, अद्यापही या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने तांड्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
निवेदनात ग्रामपंचायतीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची विविध प्रशासकीय कामे प्रलंबित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी व निवेदने सादर करूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कथित बनावट अर्ज प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही, तर ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे कायद्याच्या चौकटीत राहून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावठाणाचा प्रश्न आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांमुळे रामेश्वर तांड्यात पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन यावर कोणता निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




















