जळगाव मिरर | २५ जुलै २०२६
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) हा लोकशाहीचा विजय असल्याचा दावा केला असून, “कॉकरोच जिंकले, लोकशाही जिंकली,” अशी प्रतिक्रिया पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले, “सत्ताधारी म्हणत होते की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत; पण झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. जनतेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली.”
दीपके यांनी स्पष्ट केले की, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने आंदोलन संपलेले नाही. “आमच्या अजून दोन प्रमुख मागण्या आहेत. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांनाही इशारा देत म्हटले, “एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यास आम्ही भाग पाडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल. ही लोकशाही आहे आणि जनतेच्या आवाजापुढे कोणतेही सरकार टिकत नाही.”
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर दोन पानांचे, सुमारे ५७५ शब्दांचे पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात त्यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत विविध मुद्द्यांचा उल्लेख केला असून, दोन ठिकाणी “तरुणांची दिशाभूल” झाल्याचा उल्लेखही केला आहे.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आंदोलनाच्या दबावामुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी ‘मी टू’ मोहिमेदरम्यान झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर राजीनामा दिला होता. मात्र, आंदोलनाच्या दबावामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची ही गेल्या १२ वर्षांतील पहिलीच घटना मानली जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. जंतर-मंतरवरील आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनस्थळी उपोषण केले होते.
राजीनाम्यानंतरही आंदोलनकर्त्यांनी आपल्या उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पुढील काळात केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.




















