जळगाव मिरर | २९ जुलै २०२६
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शेतकरी दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) हे स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजेदरम्यान गणपती मंदिर परिसरातील विहिरीवर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हे बैलगाडीसह शेतात जात असतांना गावाबाहेरील गणपती मंदिर जवळील विहिरीवर फवारणी पंपात पाणी भरण्यासाठी थांबले होते. ४ ते ५ बादली पाणी काढून झाल्यावर शेवटची बादली काढत असताना पाय घसरून तोल गेल्याने ते विहिरीत पडले. मंदिर शेजारील किशोर हरी मालचे यांना हे समजताच त्यांनी गावात नातेवाईकांना कळवले. दरम्यान, दीपक पाटील यांना विहिरीतून बाहेर काढल्यावर तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, तपासणी करुन डॉक्टरांनी दीपक पाटील यांना मयत घोषित केले. या संदर्भात पोलीस पाटील, सरपंचांनी पंचनामा करून मारवड पोलिसांना माहिती दिली.
तर अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी शोकाकूल वातावरणात दीपक पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मयत दीपक पाटील यांच्या पश्चात आई, भाऊ, २ बहिण असा परिवार आहे. तर, घरातला कर्ता मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मारवड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून स.पो.नि. साजित मन्सूरी यांच्या मार्गदर्शनात हवालदार संजय पाटील तपास करत आहेत.





















