जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२६
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद बायपास मार्गालाही मोठा फटका बसला आहे. आसोदा रेल्वे पुलाजवळ रस्त्याचा भराव खचल्याने संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या भरावाखालची माती वाहून गेली. परिणामी रस्त्याचा काही भाग अचानक खचला. ही बाब निदर्शनास येताच महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्याची स्थिती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ बायपास मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आवश्यक सूचना देण्यात येत असून घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स आणि इशारा फलक लावण्यात आले आहेत.
महामार्ग प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. भराव मजबूत करण्यासह रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू आहे. रात्रीच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बायपासवरील पथदिवेही तात्पुरते बंद करण्यात आले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




















