जळगाव मिरर | १२ मार्च २०२४
शेतातून चारा घेवून येत असतांना शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी जात असतांना अचानक बैलगाडी उलटली. यामध्ये लोखंडी कठड्याला लावलेला विळा कपाळावर लागून १३ वर्षीय गौरव आनंदा पाटील (रा. वाकडी, ता. जळगाव) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवार दि. ११ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे १३ वर्षीय गौरव पाटील हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गावापासून जवळच असलेल्या म्हसावद गावातील थेपडे या शाळेत तो इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवार दि. ११ मार्च रोजी दुपारी चारा आणण्यासाठी तो बैलगाडी घेऊन शेतात गेला. वडीलांसोबत चारा तोडल्यानंतर तो चारा घेवून बैलगाडीने शेतातच्या बांधावरून येत होता. त्यावेळी अचानक बैलगाडी उलटली. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळाला लागून गौरव याचा जागीच मृत्यू झाला.
बैलगाडील उलटल्यानंतर त्याला जुंपलेल्या बैलांच्या गळयातील दुस्सर शेतात काम करणाऱ्यांना दिसला. तसेच बैल देखील मोकळे असल्याने त्यांनी बांधाजवळ धाव घेतली. यावेळी त्यांना बैलगाडी उलटून गौरव हा गंभीर अवस्थेत पडलेला दिसून आला. शेतातजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी केली असता, त्यांनी गौरव पाटील याला मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.