
जळगाव मिरर | २८ मे २०२५
दुचाकी लावण्याच्या शुल्लक कारणाने किरकोळ वाद होवून एरंडोल शहरातील गाढवे गल्लीत राहणाऱ्या अमोल कैलास पाटील (वय ३४) या तरूणाला बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल शहरातील गाढवे गल्लीत अमोल पाटील हा परिवारासह वास्तव्याला असून दि.२५ मे रोजीच्या सायंकाळी मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून त्यांच्या घराशेजारी राहणारे तुकाराम उर्फ आप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील, दीपक (गोल्या) नामदेव पाटील आणि उषाबाई तुकाराम पाटील रा. गाढवे गल्ली, एरंडोल, यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी शिवीगाळ व धमकी देवून मारहाण करण्यास सुरूवात केली. तर यातील संशयित आरोपी आशिष याने पाय पकडून उचलुन रस्त्यावरील सिमेंटरच्या रस्त्यावर आपल्याने अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. तर इतरांनी लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी पाठीवर व पोटावर मारहाण केली.
या जखमी अवस्थेत अमोल याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान सर्व आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल होवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.