
जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२५
टास्क पूर्ण करून नफ्याचे अमिष दाखवत पहिल्या दोन टास्कवर समोरच्यांनी नफा तर दिला. मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे सांगत एका ४० वर्षीय महिलेची ५ लाख २९ हजार – ६१६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. ६ ते दि.१४ जानेवारी दरम्यान घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळच्या पुणे येथील रहिवासी असलेली ४० वर्षीय महिला सध्या जळगावातील मनिषा कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. चार जणांनी टेलीग्रामच्या एका ग्रुपमध्ये त्यांना अॅड केले. महिलेला – वेगवेगळ्या प्रकारच्या टास्कची माहिती देऊन त्यातून नफ्याचे अमिष दाखविण्यात आले. त्यांनी दोन टास्क पूर्ण केल्यानंतर – त्यांना नफा दिला. मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे महिलेला सांगण्यात आले. पहिल्या दोन टास्कवर नफा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यामुळे त्या – दिलेला टास्क करू लागल्या. मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचा समोरील व्यक्तींनी दावा करीत त्यांच्याकडून रिकव्हरी म्हणून घेतलेल्या रकमेवर कोणताही मोबदला न देता ६ ते १४ जानेवारी दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण ५ लाख २९ हजार ६१६ रुपये घेतले. युपीआय, बँक खाते, आरटीजीएस अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारण्यात आली.
फसवणूक झालेल्या विवाहिता या दीड वर्षांपूर्वीच जळगावात रहायला आल्या आहेत. पूर्वी त्या एका फार्मा कंपनीत कामाला होत्या. आता त्या कामाच्या शोधत असल्याने त्यांनी त्यांचा बायोडाटा टेलीग्रामवर टाकलेला होता. सायबर गुन्हेगारांनी टेलीग्रामवरून महिलेशी संपर्क साधून घरबसल्या तुम्हाला टास्कचे काम दिले जाईल, असे सांगितले. त्यानुसार महिलेने होकार दिल्यानंतर टास्क देण्यात येऊ लागला, त्यानंतर त्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढी रक्कम देऊन मोबदला मिळत नसल्याने व मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसात फिर्याद दिल्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि.सतीश गोराडे करीत आहेत