
जळगाव मिरर । ६ ऑक्टोबर २०२५
भुसावळ येथील पंधरा बंगला रिंग रोड परिसरातील स्वामी कुटुंब नवस फेडण्यासाठी बोदवड तालुक्यातील हजरत खाजा नेमलुल्लाह शाह वली यांच्या उजनी दर्यावर गेले असता, तिथे भाविकांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १४ जण जखमी झाले असून, दोन वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते.
सविस्तर वृत्त असे कि, स्वामी कुटुंबातील लोकेश स्वामी यांचा मुलगा दर्श लोकेश स्वामी (वय १) याच्या नवस फेडण्यासाठी सुमारे ३५ ते ४० नातेवाईक उजनी दर्यावर गेले होते. दुपारी सुमारास दर्शनासाठी जात असताना, एका व्यक्तीस धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. पाहता पाहता १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी हातात लाठी, काठी, लोखंडी पाइप, दगडफेक, कुऱ्हाडी घेऊन स्वामी कुटुंबातील महिलांवर, लहान मुलांवर व पुरुषांवर बेधडक हल्ला चढवला.
या मारहाणीत विना नागराज स्वामी (५४), दिनेश गुप्ता (५५), संतोष गोविंद इदा (५३), संदीप नागराज इदा (४४), प्रेरणा हर्ष इदा (२१), स्वप्नील सोनवणे (४१), लोकेश नागराज स्वामी (३१), शरद पोळ (४७), कुणाल नागराज स्वामी (३४), तुषार सुनील इरेलला (२२), सिता निलेश गुप्ता (५०), मिना नागराज इदा (५५), रवि आमदे (६०), आशा रवि आमदे (५०) हे सर्वजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी स्वामी कुटुंबाच्या वाहनांचीही तोडफोड केली. यात टाटा मॅक्स मालवाहू (एमएच १९ सीएक्स २०२९) आणि रिअर रिक्षा (एमएच १९ क्यू ५९८१) या दोन वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच या मारहाणीत काही माहिलांचे मंगळसूत्र, कानातले सोन्याचे दागीने काढून घेतले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी त्वरित रुग्णालय स्थळी धाव घेऊन जखमींना पोलिस संरक्षणात घेऊन बोदवड पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, आरोपींची ओळख पटवून लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




















