
जळगाव मिरर | ३० मे २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यात महिलावर होणाऱ्या अन्यायाच्या घटना घडत असतांना आता कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजारामपुरी पोलिस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर एका 40 वर्षीय महिलेला दोन महिने लोखंडी साखळदंडात बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सारिका साळी असे पीडित महिलेचे नाव असून, ती तिच्या भावाच्या घरी राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि रस्त्यावरच्या वस्तू उचलून खाण्याचा प्रयत्न करत असल्याने, तिला बांधून ठेवण्याचा अमानवी कृत्य करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच क्राईम ब्रांच व राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ धाव घेत महिलेची सुटका केली. साखळदंडात बंदिस्त महिलेला कुलूप तोडणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने मुक्त करण्यात आले आणि तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस तपास सुरु असून, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तिचे भाऊ, भावजय व पुतणे एकत्र राहत असून, याच घरात ही क्रूरता होत होती. सध्या आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) चे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.