
जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४
मातीपासून महादेवाची पिंड बनविण्यासाठी जमलेल्या बालकांवर जीर्ण घराची भिंत कोसळल्याने ९ बालकांचा मृत्यू झाला, तर २ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे पीडित बालकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हरदोई मंदिर परिसरातील धार्मिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण व जिल्ह्यात शोककळा पसरली. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुर्घटनेतील पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच मृतांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तसेच निष्काळजीपणासाठी नगर पंचायतीचे प्रभारी मुख्य पालिका अधिकारी व उपअभियंत्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रहली तालुक्याच्या शाहपूर गावातील एका मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान ही घटना घडली. धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावण महिन्यानिमित्त मंदिरासमोरील भागात मंडप टाकून महादेवाची पिंड बनवण्याचे काम बालकांकडून केले जात होते. त्यातच मंदिराशेजारील एका मोडकळीस आलेल्या घराची पावसामुळे जीर्ण भिंत कोसळल्याची भीषण घटना घडली. मुसळधार पावसामुळे भिंत आणखी कमकुवत होऊन पडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत १० ते १५ वर्षे वयोगटातील ९ बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सागरचे विभागीय आयुक्त वीरेंद्र सिंग रावत यांनी दिली. दोन बालकांचा जागेवरच, तर सात जणांचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. आपल्या मुलांचे प्राण वाचू शकले असते पण आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे प्राण गेल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी लावला दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात महादेवाची पिंड बनविण्याचा कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याचे भाजपचे आमदार व माजी मंत्री गोपाल भार्गव यांनी सांगितले. भिंत कोसळून मंडपावर पडली. त्यामुळे भिंतीचा ढिगारा आणि मंडपात अडकून बालकांचा जीव गेल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करत, जखमींवर आवश्यक उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. त्याचबरोबर राज्यभरातील मोडकळीस आलेल्या घरांची ओळख पटवत त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमल नाथ यांनी पीडिताप्रती संवेदना व्यक्त केल्या






















