जळगाव मिरर | २२ जुलै २०२३
राज्यात जोरदार पाऊस सुरु असून या पावसाने आता रौद्ररूप धारण केले असून दोन दिवसाआधी रायगड जिल्ह्यात मोठी दुर्देवी घटना घडली असून तेथील बचाव कार्य सुरु असतांना आता विदर्भातील यवतमाळमध्ये पावसाचा जोर वाढल्याने आनंदनगर तांडा येथे 45 जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर, घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बचावकार्यासाठी राज्य शासनाने हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरर्स मागवले आहेत.
हवाईदलाच्या Mi-17 हेलिकॉप्टरने आता बचावकार्य करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पुर आला आहे. या पुराचा फटका अनेक गावांना बसला आहे. पुराने परिसरात वेढा घातल्याने अनेक जण पाण्यात अडकलेत. महागाव तालुक्यातील आनंद नगर येथील नागरिक पुराच्या पण्यात अडकले आहेत. त्यांचे बचावकार्य सुरू आहे.
नदीचे पाणी आनंद नदरमध्ये शिरल्याने संपूर्ण परिसराला नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर कंबरेच्यावर पाणी साचले आहे. आलेल्या पुरामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. बचाव पथक पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेची नोंद घेतली आहे.
