जळगाव मिरर । ३१ जानेवारी २०२३ ।
भारतात जशा वेगवेगळ्या जाती-जमाती आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या परंपराही वेगवेगळ्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात लग्नाच्या अनेक विचित्र प्रथाही आहेत, ज्याचे आजही पालन केले जाते. एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक राहतात. प्रत्येकजण प्रेमाने एकत्र राहतो आणि आपापल्या चालीरीतींचे पालन करतो. कुठे सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात, तर कुठे मामा-भाचीचा विवाह उत्तम मानला जातो. भारतातील अशाच काही लग्नाच्या अनोख्या प्रथा आणि पद्धतींबद्दल जाणून घेऊयात सविस्तर…
एकाच तरुणीशी होते लग्न
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये एका कुटुंबातील सर्व भाऊ एकाच तरुणीसोबत लग्न करतात. ही प्रथा फार जुनी असून या प्रथेला घोटुल प्रथा, असे म्हणतात. या प्रथेनुसार, सर्व भाऊ एकाच मुलीसोबत लग्न करतात. तेथील प्रचलित मान्यतेनुसार, किन्नौर जिल्ह्यातील गुहांमध्ये महाभारत काळात पांडव पत्नी द्रौपदी आणि माता कुंती यांच्यासोबत अज्ञातवासात होते. तेव्हापासून ही प्रथा सुरू असल्याचं सांगितलं जातं.
मेघालयातील खासी जमातीमध्ये विवाहासंबंधात एक अनोखी प्रथा प्रचलित आहे. येथील प्रथेनुसार, महिलेला एकाहून अधिक विवाह करता येतात. येथे महिला हव्या तेवढ्या वेळा लग्न करु शकते. एवढंच नाही तर त्या महिलेची इच्छा असेल तर ती तिच्या पतीला लग्नानंतर सासरच्या घरीही ठेवू शकते.
बहिणीसोबत लग्न
छत्तीसगडमधील धुर्वा आदिवासी जमातीत भाऊ-बहीण एकमेकांशी लग्न करतात. येथे चुलत भाऊ आणि बहिणीचा विवाह करण्याची प्रथा प्रचलित आहे. इतकंच नाही तर लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्यांना दंडही ठोठावला जातो.
लग्नाआधी मुलं जन्माला घालणं आवश्यक
राजस्थान आणि गुजरातमधील उदयपूर, सिरोही, पाली जिल्ह्यात राहणारे गरसिया जमातीचे लोक गुजराती, मारवाडी, मेवाडी आणि भिली भाषा बोलतात. येथे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहतात. त्यांना मूल झालं तरच त्यांच्या लग्नाला मान्यता दिली जाते. येथे लग्नाआधीच मुलांना जन्म द्यावा लागतो.
मामा आणि भाचीचं लग्न
दक्षिण भारतीय समाजात मामा-भाचीचे लग्न खूप उत्तम मानले जाते. या प्रथेमागे जमीन-मालमत्ता हे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातं. बहीण आपल्या माहेरच्या घरी हक्क मागू नये म्हणून तिचा भाऊ तिच्या मुलीसोबत लग्न करतो, असं म्हटलं जातं.