अमळनेर : विक्की उत्तम जाधव
विविध मूलभूत सुविधांसाठी महाविकास आघाडी व त्रस्त नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. हा मोर्चा पालिकेच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे घोषणाबाजी करीत मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
माजी आ. डॉ. बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकातून मोर्चास सुरुवात झाली. बस स्टॅण्ड, बाजारपेठमार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकल्यानंतर येथे घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी माजी आमदारांनी सुरुवातीला मंत्री अनिल पाटील यांना लक्ष्य करीत त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसून त्यांचे शहराकडे लक्ष नसल्याचा आरोप केला. पालिकेत निवेदन आणि तक्रारींची दखल घेतली जात नाही, गल्लोगल्ली उघड्यावर मांसविक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. गरज नसेल तिथे योजना दिल्या जात आहेत. जनतेच्या उपस्थितीत कोणत्याही मीटिंग घेतल्या जात नाहीत, सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच समजत नाही, असा टोला त्यांनी लगावला.याशिवाय माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, सेनेचे अनंत निकम व रणजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी मोर्चाला सामोरे जात भुयारी गटारीचे काम जीवन प्राधिकरणकडे असून, ५० टक्क्यांच्यावर काम पूर्ण झाले आहे. काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करून या कामास वेग देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावर डॉ. पाटील यांनी चार महिन्यांत हे प्रश्न सोडविले न गेल्यास उपोषणाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला.
या वेळी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या प्रदेश समन्वयक रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, प्रा. अशोक पवार, प्रवीण जैन, मनीषा परब, धनगर पाटील, लोटन चौधरी, विजय पाटील, जाकीर शेख, रियाज मौलाना, लतीफ मिस्तरी, रफिक शेख, बन्सीलाल भागवत, अनंत निकम, दीपिका शिंदे, शांताराम पाटील, महेश पाटील, रामराव पवार, सचिन वाघ, ताहेर शेख, मुशीर शेख, बाळासाहेब पाटील, प्रवीण देशमुख उपस्थित होते.