जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३
देशातील अनेक राज्यांमधून पाऊस माघारी परतला आहे. त्यामुळे देशातील वातावरणात मोठा बदल झाला असून काही भागात थंडीची चाहूल, तर काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसत आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. येत्या २४ तासांत अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्यानुसार, केरळमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची (Rain Alert) शक्यता आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडूमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होईल. तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातही येत्या २४ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, तमिळनाडू, उत्तर केरळ, दक्षिणी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. रायलसीमा, मणिपूर आणि मिझोरममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून देखील मान्सूनने काढता पाय घेतला आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरातही मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळे या भागात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून अनेक भागातील तापमान वाढलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होतील, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.