
जळगाव मिरर | १६ मे २०२५
राज्यातील आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये संवाद असणे महत्त्वाचे आहे. यासाठीच आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भेटी मागचे कारण सांगितले. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची देखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महा विकास आघाडी एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेल्या या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे संकेत देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहेत.
महाराष्ट्र धर्म जगला तरच देश जागेल, ही आपल्या महाराष्ट्र धर्माची खासियत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी सपकाळ म्हणाले की, आज याच विचारांवर फार मोठे संकट भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेले आहे. ही संघर्षाची वेळ आहे. या विरोधामध्ये जोरकस प्रयत्न करत असताना संघर्ष आणि लढा करणे आवश्यक आहे. या लढ्यामध्ये दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आगामी काळात सोबत कसे राहतील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक संवाद स्थापित करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व संस्थांच्या निवडणुकांमध्ये शक्य तेवढ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही एकत्र लढणार असल्याचे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच काही स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होऊ शकतात. यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल. मुंबईत महा विकास आघाडी एकत्र लढणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. या दरम्यान सपकाळ यांनी घेतलेल्या या भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच मुंबई महानगरपालिका ही महत्त्वाची निवडणूक देखील होत आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रश्नाचे उत्तर मात्र, आगामी काळातच मिळेल.





















