जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३
जळगाव जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन तसेच शिवाजी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासोबतच मोहाडी येथील १०० खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम, #म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन अशा जिल्ह्यातील एकूण २७० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे ई- भूमिपुजन आज करण्यात आले.
यात प्रामुख्याने जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम, धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम, जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास कामांचे तसेच जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकामाचे, धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम अशा अनेक विकासकामांचा समावेश होता.
निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे ७० किमी वळसा वाचणार असून लोकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे हा पूल सर्वांना वरदान देणारा ठरेल अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. त्यासोबतच हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात ३८ हजार गावांमध्ये कामे सुरू आहेत, २२ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे राज्यातील ५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचेही यासमयी नमूद केले.
याशिवाय जळगाव जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू, निम्न तापी प्रकल्पासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल. एरंडोल, यावल, चोपडा, धरणगाव तालुक्यात एमआयडीसी सुरू करण्यासाठी शासन नक्की प्राधान्य देईल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी विचार करू असेही यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी पाणीपुरवठा तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक एम, रामकुमार, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा पक्षाचे सर्व पदाधिकारी, सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.