
जळगाव मिरर | १९ मे २०२५
राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वारा व विजेचा कडकडात होत असतांना आता हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर जांब आंध येथे चौघे जखमी झाले. याशिवाय, हत्ता आणि खडकी येथे तीन गायी दगावल्या. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नैसर्गिक आपत्तीची माहिती घेऊन आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत.
शनिवारी सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि काही वेळातच पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कळमनुरी, सेनगाव आणि वसमत तालुक्यांत भुईमूग पिकांचे नुकसान झाले. मात्र, पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे मुक्ताबाई गिरी (वय ४०) या शेतात काम करत होत्या. अचानक वीजेचा कडकडाट आणि वादळी वारा सुरू झाल्याने त्या घरी निघाल्या. पावसाला सुरुवात झाल्याने त्या एका झाडाखाली थांबल्या. याचवेळी वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह शेतात झाडाखाली आढळल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे शेतात वीज कोसळून रुख्मीना मनोहर बंदुके, अंकिता संतोष बोडखे, संतोष किशन बोडखे आणि नंदाबाई किशन बोडखे जखमी झाले. यापैकी अंकिता या गरोदर आहेत. सर्व जखमींना सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुख्मीना यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
तहसीलदार देवराव कारगुडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सेनगाव तालुक्यातील खडकी येथे एक गाय, तर हत्ता येथे गोशाळेजवळ वीज कोसळल्याने दोन गायी दगावल्या. हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे दिगंबर बेले यांच्या घरावरील टिनपत्रे वादळी वाऱ्याने उडून गेली, यात एक बैल जखमी झाला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली असून, जखमींवर तातडीने उपचार आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे.





















