जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनिल जाधव (वय ३६, रा. रावेर) हे दोन दिवसांपुर्वी रावेरहून जळगाव येथे सासरवाडीला आले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर ते घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आले. रेल्वेत चढतांना त्यांचा तोल जावून ते रेल्वेखाली आल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रेलवे स्टेशनवर घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर येथे अनिल जाधव हे पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे माहेरी आल्या होत्या. त्यात दोन दिवसांपुर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले होते. त्यावेळी रात्री ९ वाजता कामायनी एक्सप्रेसमध्ये चढत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे जाधव यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.