जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२५
राज्यातील प्रत्येक शहरापासून ते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रिक्षा उपलब्ध आहे. या रिक्षाच्या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. तर राज्यात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. “या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे ” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.
यावेळी, २७ जानेवारी २०२५ रोजी म्हणजे आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री . एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली आहे. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांना साठी राबविण्यात येतील,अशी माहिती प्रताप सरनाईक यांच्याकडून देण्यात आली.
सभासद नोंदणी प्रक्रिया
राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५००/- रुपये नोंदणी शुल्क व ३००/- रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासत्व नोंदणी करता येईल. ( स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होईल!)
६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजने या योजने अंतर्गत ६५ वर्षावरील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये ” सन्मान निधी” दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.
या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.
कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.
बक्षीस योजना राबविण्यात येणार
उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक ,उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. या बैठकीला परिवहन आयुक्त श्री. विवेक भीमनराव यांच्या सह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.