जळगाव मिरर / ३ मार्च २०२३ ।
शहरातून कानळदा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरने उभ्या असलेल्या शेतकर्याच्या उभ्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील लक्ष्मी जिनिंग जवळ आव्हाने येथील शेतकरी दगडू राजाराम धनगर यांचे शेत आहे. ते नेहमी प्रमाणे सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले. त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. याच दरम्यान रोडवर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणार्या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते, अन्यथा त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता होती. दरम्यान, अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता.
घटनास्थळी पोलीस दाखल !
तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे काही वेळातच घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांची समजूत काढत होते पण गावकरी रस्ता रोको करण्यावर ठाम असल्याचे चित्र घटनास्थळी दिसून आले होते. तर काही वेळाने शेतकरीचा संताप शांत करण्यात पोलीस विभागाला यश आले होते.
