जळगाव मिरर | १० जुलै २०२६
जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत जळगाव शहरातील विनय दिलीप चौधरी आणि वरणगावचे रितेश विजय तायडे यांनी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत यश मिळवत राष्ट्रीय कबड्डी पंच म्हणून मान्यता प्राप्त केली आहे. या यशामुळे आगामी राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये अधिकृत पंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या परीक्षेत पंचांचे कबड्डी खेळावरील नियमांचे सखोल ज्ञान, तांत्रिक कौशल्य, निर्णयक्षमता, खेळाचे अचूक आकलन तसेच प्रत्यक्ष मैदानावरील पंचगिरीचा अनुभव अशा विविध निकषांवर कसून मूल्यमापन केले जाते. या कठीण प्रक्रियेत यश संपादन करत विनय चौधरी आणि रितेश तायडे यांनी जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे.
दोन्ही पंचांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि कबड्डी खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना नवी प्रेरणा मिळाली असून जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनरावजी भावसार, उपाध्यक्ष चंद्रकांत लोढाया व बशीर बागवान, कार्याध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, खजिनदार सुनील राणे, ॲड. रोहन बाहेती, अलेक्झांडर मणी, संजय संसारे, नयनसागर मणी, भास्कर पाटील, हितेश सोनी, अनिल कोळी, विवेक पाटील, प्रा. हरीश शेळके, आनंद महंगडे यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय पंच म्हणून मिळालेल्या या मान्यतेमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय कबड्डी क्षेत्रात अधिक ठळकपणे झळकणार असून भविष्यात जिल्ह्यातून आणखी गुणवंत पंच आणि खेळाडू घडण्यासाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.




















