जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
महाराष्ट्रासह देशभरात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. आज २८ एप्रिल, शुक्रवार ते 4 मे पर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडणार आहे. उत्तर भारतात सर्वाधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती. अनेक भागात पारा चाळीशीच्या पुढे गेला होता. दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि संत्री कुजली आहेत. कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कंधार येथे आज सकाळी जोरदार पाऊस झाला. बुलढाण्यातील मोताळा येथेही जोरदार पाऊस झाला. आता पुढील पाच दिवसही महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच जोरदार वारेही वाहतील. महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाले तर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजाही पडू शकतात. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे पुढील पाच दिवस कच्चा घरे, भिंती, झोपड्या कोसळण्याच्या घटनाही समोर येणार आहेत.
