जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५
केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारने अलीकडच्या काळात पातळी नसताना देखील काही लोकांना भारतरत्न दिला आहे. त्याऐवजी देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले आहेत. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. या दोघांनाही एकाच वेळी भारतरत्न देण्यास नरेंद्र मोदी सरकारला काहीही हरकत नसल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. सरकार कलम 370 रद्द करू शकते, तर भारतरत्न देण्यास काय हरकत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस सरकारनेही यासंबंधीचा ठराव लवकर केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.
आज वीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे. वीर सावरकर हे महान लेखक, कवी, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक होते, त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास वाचायला हवा. वीर सावरकर यांच्या गीताबद्दल त्यांना जो पुरस्कार दिला जातो, तो स्वागतार्ह निर्णय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, या देशात दोनच हिंदूहृदयसम्राट होऊन गेले आहेत. स्वा. सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली आहे. बाकी सर्व त्यांचेच पुण्य खात आहेत. त्यांच्या पुण्यावरवच जगत आहेत. हिंदूहृदयसम्राट सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणा सूत्र मानतात तर कधी बाळासाहेब ठाकरे यांना मानतात. त्यांनीही लवकर या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
दिल्ली येथील साहित्य संमेलनात भाषण करताना देखील मोदींनी सावरकरांचा संदर्भ दिला होता. त्यामुळे माझी आणि पक्षाच्या वतीने अशी भूमिका आम्ही वारंवार मांडत आहोत. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांना एकाच वेळी भारतरत्न देण्यास काहीच हरकत नाही. दोघेही या देशातील हिंदूंचे प्रेरणास्थान राहिले आहे. त्यामुळे किमान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे
