अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील आठही मंडळात २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा किसान काँग्रेसच्या वतीने प्रा. सुभाष पाटील यांनी देत शेतकऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
तालुक्यात सन २०२१ च्या खरीप हंगामात पाच मंडळात अतिवृष्टी, दोन मंडळात अवकाळी पाऊस आणि एका मंडळात गुलाबी वादळामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करून निधीची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करून ही कोणतीही मदत देण्यात आली नाही. त्यासंदर्भात डिसेंबर २०२१ मध्ये प्रा. सुभाष पाटील यांनी तहसीलदारांना अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत दोन वर्ष उलटत आली तरी कोणतीही मदत दिली नाही. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत देवू केली होती. मात्र अमळनेर तालुक्यात सर्वाधिक जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होवून ही तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. २०१९ मधील अतिवृष्टी बाधित ३२ गावातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या संघर्षानंतर तब्बल दोन वर्षांनी हक्काची मदत मिळाली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर कायम अन्याय प्रशासनाकडून करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेते मात्र मूग गिळून गप्प बसली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या रास्त मागण्यांसाठी कायम संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
वेळोवेळी मागणी करूनही दोन वर्ष उलटली तरी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला प्रशासन जर दाद देणार नसेल तर आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय नाही.
-प्रा. सुभाष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, किसान काँग्रेस जळगाव