
जळगाव मिरर | ८ जुलै २०२४
देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या काही तास उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील सर्व बीएमसी, सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुराचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहे. मुसळधार पावसामुळे रायगड किल्ल्यावरही अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आमदारांना देखील बसला आहे. पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला येण्यासाठी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. विदर्भ, अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली आहे. या ट्रेनमध्ये 10 ते 12 आमदार असल्याची माहिती आहे. अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील ट्रँकनं चालत बाहेर निघाले आहेत. किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचा लोंढा वाहत आहे. मुख्य पायऱ्यांवरील काही भागात मोठ-मोठे धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले. यातून कसेतरी हे पर्यटक पावसाच्या कचाट्यातून सुखरुप बाहेर पडले आहेत.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या काही तास उशिराने धावत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक सखल भाग हे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून येत्या 10 जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील 5 दिवस कोकणातील अनेक जिल्हे आणि मुंबईसह उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.






















