
जळगाव मिरर | ३० जून २०२४
राज्यातील सरकारने दोन दिवसापूर्वीच अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर चांगलाच हल्लाबोल देखील झाला होता तर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक टोला लगावला आहे.
खा.सुळे म्हणाले कि, निवडणुका आल्यामुळे सध्या त्यांना लाडकी बहीण-भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत सदानंद सुळे यांच्यासह रविवारी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. मंगलमय वातावरणामध्ये पालखीचे पुण्यात आगमन होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला बळीराजाला न्याय मिळू दे असे साकडं विठुरायाला घातल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून नुकताच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. यावर सुप्रिया सुळे यांनी खोचक भाष्य केले आहे. ”निवडणुका आल्यामुळे सध्या त्यांना लाडकी बहीण-भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. उशीरा का होईना सरकारला जाग आली. मात्र, या योजनेमध्ये खूप सार्या त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. परत याबाबतची भूमिका आम्ही स्पष्ट करू. जुमलांचा पाऊस हा बजेटमधून अपेक्षितच होता. त्यामुळे वेगळं काही या बजेटबाबत वाटत नाही”, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
बीडमधील परळीमध्ये सरपंचाची हत्या करण्यात आली. यावरून सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ”एक ते सव्वा वर्षापासून मी गृहमंत्रालयाच्या कारभारावर बोलत आहे. पोलिसांवर माझं प्रचंड प्रेम आदर आणि विश्वास आहे. मात्र, गृहमंत्रालयाचा अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील क्राइम रेट वाढला असून त्यावर गृह मंत्रालयाचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे सबंध महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.






















