
जळगाव मिरर | २९ मे २०२६
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी वाहनाने अॅक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वराडसिम येथील रहिवासी आरती उमाकांत भारंबे (वय ४०) या आपले पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्यासह खेडी (जळगाव) येथून पापड तयार करून अॅक्टिव्हा (एमएच १९, डीआर ३२४१) या दुचाकीवरून वराडसिमकडे जात होत्या. २८ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास सुनसगाव–बेलव्हाळ मार्गावरील गोजोरे गावाजवळ गोजोरेकडून नशिराबादकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी (एमएच ०४, ईडी ५६२) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गावाचे उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच वेफर्स व्यवसाय करणाऱ्या मंदाबाई भय्या कोळी यांनी तत्परता दाखवत दोघांनाही रिक्षाद्वारे जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गंभीर दुखापतीमुळे आरती भारंबे यांचा मृत्यू झाला. तर उमाकांत भारंबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अपघातातील ओमनी चालकाचे नाव समजू शकले नसून संबंधित वाहन मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
दोन्ही अपघातग्रस्त वाहने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक करीत आहेत.
नशिराबाद ते बोदवड मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर डंपर, ट्रक आणि इतर जड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसविण्यात यावेत तसेच पुलावर संरक्षक कठडे उभारण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.





















