
जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत असतांना नुकतेच चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे एक भयंकर घटना घडली आहे. बापाच्या डोळ्यादेखतच बालिकेला बिबट्याने ओढून नेल्याने तिचा करुण अंत झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लिंबाच्या बागेत वडील काम करत असताना त्यांच्या बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. गेल्या चार महिन्यांत बिबट्याचा हल्ला झाल्याची तिसरी घटना आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारात पुष्कर रवींद्र चव्हाण यांचे शेत असून शेतात लिंबाच्या बागेची राखण करण्यासाठी चार ते पाच महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कांज्या मांजऱ्या पावरा हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्यास आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान कांज्या पावरा हे लिंबाच्या बागेत काम करीत होते. यावेळी बाजूलाच त्यांची मुलगी रसला (वय ४) खेळत होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या बालिकेवर झडप घालत तिला ओढत नेले. सदरचा प्रकार लक्षात येताच कांज्या पावरा याने आरडओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले. शेतकऱ्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यानंतर हल्ला करणारा बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रसला हिला तत्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
कन्नड घाट गावापासून जवळच असल्यामुळे बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे रांजणगावच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बालिकेचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये अगोदर असलेली बिबट्याची भीती आणखी वाढली आहे. त्यामुळे शेतांमध्ये वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.