जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती-पत्नीत वाद होऊन पतीने पत्नीला मारहाण करीत मानेवर विळ्याने वार केला. ही घटना दि. १२ जानेवारी शुक्रवार रोजी हरिविठ्ठल नगरात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परीसरात अजित हमीद तडवी (वय ३१) हे वास्तव्यास असून त्यांचे व त्यांची पत्नी शहनाज तडवी (वय २२) या दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यामुळे त्यांची पत्नी शहनाज या हरिविठ्ठल नगर येथे आपल्या माहेरी निघून गेल्या. त्यांना घेण्यासाठी अजित तडवी गेला असता त्याठिकाणी देखील त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी तुम्ही दारू सोडली व कामधंदा केला तर मी सोबत येईल, असे सांगितले. त्याचे वाईट वाटून पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच विळ्याने मानेवर वार करून जखमी केले व तू माझ्यासोबत नांदायला आली नाही तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी शहनाज तडवी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती अजित तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करत आहेत.