जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२६
मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती माणसाच्या विचारांची, भावनांची आणि संस्कारांची खरी ओळख आहे. मातृभाषेतूनच व्यक्तिमत्त्व घडते आणि संस्कार रूजतात, त्यामुळे मराठी भाषा ही आपली अस्मिता आणि संस्कारांची शिदोरी आहे, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
रावेर येथील रंगपंचमी व्याख्यानमालेतील यंदाचे पहिले पुष्प गुंफतांना माझी मायबोली व माझी अस्मिता या विषयावर त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मातृभाषा संवर्धन पंधरवडा आणि रंगपंचमी व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यंदाच्या रंगपंचमी व्याख्यानमालेचा श्रीगणेशा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष तथा रंगपंचमी व्याख्यानमालेचे विश्वस्त डॉ. राजेंद्र आठवले होते.
प्रारंभी सरदार जी. जी. कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली व आध्यात्मिक ग्रंथांची पालखी वाजत-गाजत काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर भारावून गेला. यावेळी मराठी भाषा पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
माझी मायबोली व माझी अस्मिता या विषयावर बोलताना डॉ. जगदीश पाटील यांनी नारद मुनींनी सांगितलेली नवविधा भक्ती, तसेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना मराठी भाषेचीच निवड का केली, याचे सुस्पष्ट विवेचन केले. मराठी भाषा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची असून ती अभिजात भाषा आहे, असे सांगताना त्यांनी ज्ञानेश्वरीला सामाजिक व भाषिक आविष्काराचे उत्कृष्ट उदाहरण ठरवले. वारकरी संप्रदायातील संत एकनाथ व संत तुकाराम यांच्या कार्याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मातृभाषेचा जो प्रचार व प्रसार केला, त्याची उजळणी करताना त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. उच्च शिक्षणासाठीसुद्धा मातृभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. भाषा आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधता आला पाहिजे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी स्वतःचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे, वाचन करावे, विविध विषयांवर चर्चा करावी, भारतीय संस्कृती विसरू नये, मूल्ये व संस्कार जोपासावे, शिक्षकांचा आदर ठेवावा, असे मौलिक मार्गदर्शन करून पोट भरणे हेच आयुष्याचे ध्येय नसून, आपल्यातील मूल्ये हेच आपले खरे भांडवल आहे, असा संदेश देऊन डॉ. जगदीश पाटील यांनी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. राजेंद्र आठवले यांनी नवविधा भक्ती, श्रवणभक्तीचे महत्त्व, ज्ञान व कौशल्याचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी होणारा उपयोग यावर मार्गदर्शन केले. हंस व बगळा यांचे उदाहरण देत त्यांनी निरक्षीरवृत्ती समजावून सांगितली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी परदेशात मातृभाषेचा ठसा उमटविल्याची उदाहरणेही त्यांनी दिली. व्याख्यानास सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रा. एन. जे. पाटील, संस्थेचे सहसचिव प्रा. बी. आर. महाजन, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शैलेश राणे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. बी. एल. सरोदे, रंगपंचमी व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य, यंदाचे अध्यक्ष प्रा. पंकज पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रा. क्रांती नाईक, प्रा. एल. जे. तडवी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. आर. रोझोतकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन रंगपंचमी व्याख्यानमालेचे सचिव व सरदार जी. जी. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक प्रा. व्ही. व्ही. पाटील यांनी केले.




















