जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२६
खान्देशच्या मातीत जन्मलेल्या, अक्षरांचे औपचारिक ज्ञान नसतानाही आपल्या सहज, साध्या आणि हृदयाला भिडणाऱ्या अहिराणी बोलीतून जीवनाचे गूढ तत्त्वज्ञान मांडणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी आजही लाखो रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या काव्यातून उमटलेले निसर्ग, माणूस, संसार, दुःख, सुख आणि जगण्याचे वास्तव आजच्या पिढीलाही अंतर्मुख करते. अशा या खान्देशच्या अमूल्य रत्नाची जीवनगाथा आता पहिल्यांदाच वेब सिरिजच्या माध्यमातून जगासमोर येत आहे.

‘खान्देशची लेकबाय’ या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित वेब सिरिजचा पहिला भाग २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे बहिणाबाईंच्या जन्मभूमीत त्यांच्या स्मृतींना एका आगळ्यावेगळ्या कलात्मक माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे.
खान्देशच्या मातीतून उमललेलं काव्यविश्व
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे आयुष्य म्हणजे संघर्षातून उमललेली प्रतिभा आणि अनुभवातून जन्मलेले काव्य. शाळेच्या वर्गात जाऊन अक्षरांची ओळख करून घेण्याची संधी त्यांना मिळाली नाही; मात्र निसर्ग, शेती, कष्ट, संसार आणि माणसांच्या भावविश्वातून त्यांनी जीवनाचा असा धडा शिकला, जो पुढे त्यांच्या काव्यातून अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. त्यांच्या ओठातून सहज उमटणाऱ्या शब्दांना साहित्यिक अलंकारांची गरज नव्हती. कारण त्या शब्दांमध्ये खान्देशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव आणि माणुसकीची ऊब होती. अहिराणी बोलीतील त्यांचे काव्य आजही ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्र उभे करते. याच बहिणाबाईंच्या जीवनातील विविध पैलू, त्यांचा संघर्ष, त्यांचे कुटुंबीय जीवन, त्यांच्या मनातील भावविश्व आणि त्यांच्या काव्यप्रतिभेचा जन्म यांचा वेध ‘खान्देशची लेकबाय’ या मालिकेतून घेतला जात आहे.
बहिणाबाईंच्या मूळ गावातच चित्रीकरण
या वेब सिरिजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मालिकेतील बहुतांश महत्त्वाचे प्रसंग बहिणाबाई चौधरी यांचे मूळ गाव असोदा आणि जळगाव येथील वाड्यात चित्रित करण्यात येत आहेत. त्यामुळे पडद्यावर दिसणारे वातावरण, माती, वाडे आणि परिसर या सर्वांमधून बहिणाबाईंच्या काळाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या मातीत बहिणाबाईंच्या पावलांचे ठसे उमटले, ज्या वातावरणातून त्यांच्या काव्याला आकार मिळाला, त्याच परिसरात त्यांच्या जीवनाची कथा चित्रीत होत असल्याने या मालिकेला एक वेगळे भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
बहिणाबाईंची कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न
आजच्या डिजिटल युगात नव्या पिढीपर्यंत बहिणाबाईंचे साहित्य आणि त्यांचे जीवनकार्य पोहोचावे, त्यांच्या संघर्षाची आणि प्रतिभेची ओळख व्हावी, या उद्देशाने ‘खान्देशची लेकबाय’ या वेब सिरिजची निर्मिती करण्यात आली आहे. ही केवळ एका कवयित्रीची जीवनकथा नसून, खान्देशच्या संस्कृतीची, बोलीची, मातीतल्या माणसांची आणि एका असामान्य स्त्रीच्या असामान्य प्रतिभेची कहाणी आहे.
या कलाकारांच्या प्रयत्नांतून साकारतेय ‘खान्देशची लेकबाय’
या वेब सिरिजची संकल्पना व निर्मिती अंकिता वाघूळदे यांची असून, लेखक व दिग्दर्शक ज्ञानदीप कलाल आहेत. अपड्रॉईड एआय इनोवेशन्स (AppDroid AI Innovations) यांची सहनिर्मिती लाभली आहे. मालिकेचे छायांकन व्ही.के. स्टुडियोज (V.K. Studiozz) कल्पेश नागपूरे यांनी केले आहे. संपूर्ण मालिकेच्या निर्मितीसाठी अंकिता वाघूळदे, ज्ञानदीप कलाल, चेतन गिरनारे, अमीत भामेरे, कल्पेश नागपूरे यांच्यासह अनेक सहकारी तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
जुन्या आठवणी जगवण्यासाठी AI टच
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १९८० रोजी असोदा गावी झाला आणि त्यांचा मृत्यू ३ डिसेंबर १९५१ मध्ये झाला. बहिणाबाई चौधरी यांची जीवनगाथा १९०० च्या दशकातील असल्याने प्रेक्षकांना तेव्हाचा खराखुरा अनुभव मिळावा यासाठी निर्मात्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. जुन्या आठवणी जागवण्यासाठी व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांना AI च्या मदतीने जुने व्हिडिओ असल्याचे दाखवण्याची किमया अपड्रॉईड एआय इनोवेशन्सची टीम करत आहे.
खान्देशच्या लेकबाईची गाथा प्रत्येकाने अनुभवावी…
बहिणाबाईंच्या कविता आपण अनेकदा ऐकल्या, वाचल्या आणि गुणगुणल्या आहेत. मात्र त्या शब्दांच्या मागे उभे असलेले त्यांचे आयुष्य, त्यांचा संघर्ष, त्यांचे भावविश्व आणि त्या शब्दांना जन्म देणारी माती समजून घेण्याची संधी ‘खान्देशची लेकबाय’ या वेब सिरिजमधून मिळणार आहे. खान्देशच्या मातीने महाराष्ट्राला दिलेल्या या अमूल्य लेकबाईची जीवनगाथा आता डिजिटल पडद्यावर जिवंत होत आहे. बहिणाबाईंच्या स्मृतींना त्यांच्या जयंतीदिनी वाहिलेले हे अनोखे कलात्मक अभिवादन निश्चितच खान्देशवासीयांसाठी अभिमानाचा आणि भावनेचा क्षण ठरत आहे. ‘खान्देशची लेकबाय’चा पहिला भाग प्रदर्शित झाल्याने आता पुढील भागांत बहिणाबाईंच्या जीवनातील कोणते पैलू उलगडणार, याची उत्सुकता रसिकांमध्ये निर्माण झाली आहे.




















