
जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
मित्राचे इतरांसोबत सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच टणक वस्तू डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पवन नगरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगरात राहणारा राहूल दिलीप तायडे (वय ३७) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील पवन नगरातील सात खोल्याजवळ राहूलचा मित्र निखील चौधरी यांचे काहीतरी कारणावरून शुभम पाटील, नरेश पाटील आणि पवन सोनवणे सर्व रा. जळगाव यांच्या सोबत भांडण सुरू होते. मित्राचे भांडण सुरू असल्याचे पाहून राहूल तायडे हा भांडण सोडविण्यासाठी गेला. या रागातून शुभम पाटील, नरेश पाटील आणि पवन सोनवणे या तिघांनी शिवीगाळ करत राहूल तायडे याला बेदम मारहाण केली तर एकाने टणक वस्तू डोक्यात टाकल्याने गंभीर जखमी केले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली.
जखमी राहूल तायडे याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे शुभम पाटील, नरेश पाटील आणि पवन सोनवणे सर्व रा. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों सुधाकर शिंदे हे करीत आहे