जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसला अचानक पेट घेतल्याचे वृत्तसमोर आले आहे. हि घटना रावेर- सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली असून यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने प्रवास करणारे २० प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेरहून सायंकाळी ७ वाजता खासगी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघाली. वाटेत वडगाव-वाघोदा (ता. रावेर) दरम्यान सुकी नदीच्या पुलाजवळ बसचे टायर फुटले. त्यामुळे बसने अचानक पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी प्रवासी पटापट खाली उतरले. काहीजणांचे साहित्य बसमध्ये राहिल्याने ते आगीत खाक झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सावदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सपोनि जालिंदर पळे हे करीत आहेत.