जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच १५ डिसेंबरच्या मध्यरात्री भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला दिलेल्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काटोल तालुक्यातील रहिवासी मृत व्यक्ती असून शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परतत होते. मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच जखमीवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.