
जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
वीज मीटर नादुरुस्त असून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या धनराज वायरम व गोटू वायरमन (पूर्ण नाव समजू शकले नाही) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील ३० वर्षीय तक्रारदार यांच्या घरचे पाच वीज मीटर महावितरणच्या भरारी पथकाने काढून नेले होते. त्यांनी ते मीटर नादुरुस्त असल्याचे सांगितले. या प्रकरणात वीज चोरीचा गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसल्यास १ लाख ५० रुपयांची मागणी केली होती. यामध्ये तडजोडी अंती १ लाख रुपये स्वीकारण्याचे दोघांनी मान्य केले. या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने लाचेच्या मागणीविषयी पंचासमक्ष खात्री केली असता एका मीटरसाठी ३० हजार रुपये या प्रमाणे एकूण एक लाख ५० हजार रुपये मागितले. मात्र एक लाख रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे समोर आले त्यानुसार पथकाने धनराज वायरमन आणि गोटू वायरमन या दोघांना मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी ताब्यात घेतले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.